मराठा समाजाचा असल्यामुळे वरिष्ठांकडून माझा छळ केला जात आहे, असा खळबळजनक आरोप अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी केला आहे. विठ्ठल जाधव यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी व्हॉटअॅपद्वारे हा संदेश पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना पाठवला होता. मी मराठा समाजाचा असल्यामुळे माझ्यावर दबाव आणि दडपण आणले जात आहे. या दडपणामुळे मी कदाचित आत्महत्या करेन, असे या संदेशात म्हटले आहे. या संदेशात विठ्ठल जाधव यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना लक्ष्य केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
डीजीपींकडून होणारी सततची अवहेलना सहनशिलतेपलिकडची आहे. त्यामुळे आत्महत्येची वेळ आली असून स्वत:ला संपविण्यापूर्वी छळाबाबतची प्रत्येक गोष्ट माध्यम आणि कौटुंबिक सदस्यांकडे मांडेन, अशी धमकीही जाधव यांनी या संदेशात दिली आहे. आत्महत्येची धमकी देणारा हा संदेश जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्यानंतर तो काहींनी डीजीपींकडे ‘फॉरवर्ड’केला. शिवाय, हा संदेश सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रासह राज्याच्या पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विठ्ठल जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या वादाला काही महिन्यांपूर्वी उमरखेड येथे गणेशोत्सवादरम्यान झालेल्या दंगलीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. यावेळी विठ्ठल जाधव आणि सतीथ माथूर यांच्यात खटके उडाले होते. गेल्यावर्षी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास ढोले यांनी विठ्ठल जाधव यांच्यासह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.