ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक – राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. ‘नवभारत’ या मासिकाचे ते संपादकही होते. गेल्या काही वर्षांपासून शारीरिक व्याधींमुळे त्यांनी लिखाण थांबवले होते.
वसंत पळशीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला होता. वैयक्तिक आयुष्यात वैचारिकतेला महत्त्व देणारे पळशीकर हे त्यांच्या साधेपणासाठीही तितकेच ओळखले जात. संवादाला प्राधान्य देणारे पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री – पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अर्धांगवायूने ग्रासले होते. शनिवारी पहाटे नाशिकमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे. पळशीकर यांच्या निधनाने पठडीबाहेरचा विचारवंत आणि एक मार्गदर्शक गमावल्याची हळहळ व्यक्त होत आहे.