पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राने वीरपूत्र गमावला, सांगलीचे नितीन सुभाष शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाककडून सुरू असलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचे वीरपूत्र नितीन सुभाष हे शहीद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. पाककडून कालपासून माछिल सेक्टरमध्ये सुरू असलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) नितीन सुभाष आणि मनदीप सिंग हे जवान धारातीर्थी पडले आहेत. यापैकी नितीन सुभाष हे सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पाकने केलेल्या गोळीबारात काल नितीन गंभीर जखमी झाले होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यान, कालच्या माछिल सेक्टरमधील आणखी एका चकमकीदरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचाही प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी टट्टापानी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर धुळ्यातील चंदू बाबुलाल चव्हाण पाकच्या ताब्यात सापडले होते. मात्र, वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊनही पाकने अजूनही चव्हाण यांना सोडण्याची तयारी दाखविलेली नाही. या घटनांमुळे पाकविरोधातील असंतोष वाढत आहे.
दरम्यान, शुक्रवारी भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाक रेंजर्सच्या १५ जवानांचा मृत्यू झाला होता. सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने सीमा रेषेवरील गावात राहणा-या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाकच्या गोळीबारात घरांचे नुकसान होत असून भीतीपोटी अनेकांनी आता सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या नितीन सुभाष या जवानाचाही शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घरात घुसून एका महिलेची हत्या केल्याची घटनाही समोर आली आहे.शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी बीबा नामक महिलेच्या घरात घुसून तिची हत्या केली. या घटनेच्या वेळी त्या महिलेची लहान मुलंही घरात होती. पण सुदैवाने दहशतवाद्यांनी त्यांना सोडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *