रविवारच्या मराठा मोर्चासाठी ठाणे सज्ज

कोपर्डी प्रकरणातील आरोपीला फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा आदी मागण्यांसाठी येत्या रविवारी, १६ ऑक्टोबर रोजी ठाणे शहरात ठाणे जिल्ह्याचा मराठा मूक क्रांती मोर्चा निघणार आहे.

या मोर्चात सुमारे १५ लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. या मोर्च्यामुळे ठाणे शहर संपूर्णपणे पॅक होईल, असा दावा मोर्चाच्या संयोजन समितीचे सदस्य कैलास म्हापदी यांनी ‘प्रहार’शी बोलताना केला आहे.

ठाणे शहरातील तीन हात नाक्यापासून सकाळी १० वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. यात ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड, वाडा, विरार, नालासोपारा, वसई भागातील मराठा समाज सहभागी होणार आहे. तर मुंबईत वास्तव्याला असलेला मराठा समाजही या मोर्चात सहभागी होणार आहे.

ठाणे शहरात मोर्चाच्या मार्गाचा विचार करता या रस्त्यावर अवघे पावणेदोन लाख लोक उभे राहू शकतात. तर मोर्चासाठी मात्र १५ लाख लोक येणार असल्याचा दावा संयोजन समितीने केला असून त्यामुळे ठाण्यात उभे राहायलाही जागा उरणार नाही.

या मोर्चेक-यांसाठी ठाण्यातील तीन हात नाक्याच्या सर्व दिशांचे सव्‍‌र्हिस रोड, साकेत मैदान, पोलीस मैदान, रुस्तमजी मैदान, पटनी कंपनीचे मैदान आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे गाडय़ा उभ्या करून चालत त्यांनी तीन हात नाक्यापर्यंत येऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर मोर्चाच्या वतीने मराठा समाजातील महिला जिल्हाधिका-यांना निवेदन देतील. काळे कपडे घालून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

ठाणेकरांना सहकार्याचे आवाहन

मोर्चासाठी रविवारचा रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द केला. लोकलनेही हजारो मोर्चेकरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेशन ते तीन हात नाक्याकडे जाणारा गोखले रोड आणि स्टेशनकडून सॅटिस पुलाखालून व बाजारपेठेतून कोर्टनाक्याकडे जाणारे दोन्ही रस्ते पूर्णपणे जाम होण्याची शक्यता आहे.

ठाणेकरांनी या मोर्चाला सहकार्य करून यादिवशी आपली महत्त्वाची कामे लवकर उरकून घ्यावीत किंवा मोर्चाच्या नंतर करावीत आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्यतो वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन कैलास म्हापदी यांनी केले आहे.

नियोजनासाठी स्वयंसेवकांच्या २० समित्या

हा मोर्चा निर्विघ्नपणे पार पडावा आणि मोर्चेक-यांना कुठलाही त्रास होऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संयोजन समितीच्या वतीने स्वयंसेवकांच्या २० समित्या स्थापन केल्या आहेत.

स्वच्छता, आरोग्य, ट्रॅफिक कंट्रोल, पोलीस समन्वय, वॉर रूम, कंट्रोल रूम, वॉकी टॉकी नियंत्रण, प्रसिद्धी समिती आदी समित्या आहेत. यातून सुमारे ३ हजार स्वयंसेवक मोर्चाच्या नियोजनासाठी काम करणार आहेत. या स्वयंसेवकांना गुरुवारी ठाण्यात एकदिवसीय शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.

मोर्चाच्या आदल्या दिवशी, म्हणजे शनिवारी रात्रीच हे स्वयंसेवक ठाणे शहराचा ताबा घेणार आहेत. बाहेरगावाहून येणारे मोर्चेकरी रात्रीपासूनच ठाण्यात येणार असून त्यांचे नियोजन करण्यासाठी हे स्वयंसेवक काम करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *