खेड तालुक्यात परतीचा पाऊस दमदार झाल्याने पाणी व चाराटंचाईची समस्या सुटली आहे. सर्वत्र डोंगरचारा, बांधावरील गवत, घास, कडवळ यांची वाढ चांगली झाली आहे.
गेली तीन वर्षे जनावरांच्या पाण्याची समस्या व चाराटंचाईची समस्या भेडसावत होती. त्यामुळे शेतकर्यांनी दुभती जनावरे विकून टाकली होती. या वर्षी तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही. परतीच्या पावसाने पुन्हा धरणे, तळी, तलाव, ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. दुभत्या जनावरांसाठी विलायती घास, कडवळ, भुईमूग पाला जास्त असल्याने जनावरेदेखील तब्येतीने चांगली झाली आहेत व दूध उत्पादनात वाढ झाली आहे. पूर्व भागात गायराने व खासगी राने जास्त प्रमाणात आहेत. पाऊस थांबल्याने गवताची वाढ चांगली झाली आहे. सर्वत्र जनावरे चारा खातानाचे दृश्य दिसत आहे. निमगाव, गुळाणीखपूर, गुळाणी, कनेरसर, खरपुडी, जैदवाडी, जरेवाडी, जऊळके, चौधरीवाडी, गाडकवाडी, वरूडे या भागांत चारा जास्त प्रमाणात आहे.