चणाडाळ, साखरेचे दर नियंत्रणात राहणार

दिवाळीच्या तोंडावर चणाडाळ आणि साखरेचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी राज्य सरकारने खबरदारीची उपाययोजना करायला सुरवात केली आहे. साखरेचे दर किरकोळ बाजारात 39 रुपये आणि चणाडाळीचे दर 120 रुपयांच्या आतच राखावेत, असे निर्देश व्यापाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या वर्षी तूरडाळीने ग्राहकांच्या तोंडाला फेस आणल्यानंतर दिवाळीत साखर आणि चणाडाळीचा भडका उडू नये याची दक्षता अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतली आहे. चणाडाळीचे उत्पादन घटल्याने केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियामधून डाळीची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही डाळ नोव्हेंबरअखेरीस येणार असल्याने त्यापूर्वी दिवाळीचे तीन आठवडे चणाडाळीचे दर नियंत्रणात ठेवण्याची कसरत विभागाला करावी लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ बाजारात साखरेचे दर 39 आणि चणाडाळीचे दर नफ्यासह 120 रुपयांच्या आतच ठेवणे शक्‍य आहे. बाजारात चणाडाळ आणि साखरेचा असलेला साठा आणि मागणी याचे प्रमाण ठरवूनच या किमती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यापेक्षा अधिक किमतीने बाजारात साखर आणि चणाडाळ विकली जाणार नाही याची दक्षता विभागाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा चणाडाळीचे आणि साखरेचे उत्पादन घटले आहे. नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियातून चणाडाळ येणार आहे, तर मध्य प्रदेशमधील रब्बीची चणाडाळ डिसेंबरपर्यंत बाजारात येणार आहे. या वर्षी मध्य प्रदेशमध्ये चणाडाळीचे उत्पादन चांगले आले असल्याने डिसेंबरमध्ये चणाडाळीच्या किमती आटोक्‍यात असण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. मात्र दिवाळीमध्ये साखर आणि चणाडाळीला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असते. उत्पादन कमी आणि मागणी जास्त झाल्यावर किमती भडकतात; शिवाय साठेबाजीदेखील होत असल्याने ते रोखण्यासाठी विभागाने दक्षता घ्यायला सुरवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *