भाजपाचे नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. जयललिता बर्याच दिवसापासून रुग्णालयात असल्याने राज्याचे प्रशासन कोलमडले आहे, असा दाखला स्वामी यांनी दिला आहे.
स्वामी यांच्या मते, जयललिता या रुग्णालयात असल्याने तामिळनाडूत प्रशासन कोलमडले आहे. परिणामी राज्यात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल सक्रिय झाले आहेत. स्वामींनी म्हटले आहे की, डॉक्टरांच्या मतेही जयललिता यांना अजून काही दिवस रुग्णालयात रहावे लागणार आहे, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनीही चेन्नईतील अपोलो रुग्णालयात जाऊन जयललिता यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जयललिता यांची तब्बेत लवकरच सुधारेल व त्या लवकरच राज्याचे काम पाहतील.
