पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरण 100 टक्के भरल्याने पुढील वर्षी 31 जुलैपर्यंत नियमित आणि सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा आहे. धरण पूर्ण भरलेले असले, तरी वर्षभर दिवसातून एकच वेळ पुरवठा केला जाणार आहे. सध्या धरणातून रावेत जलशुद्धीकरण केंद्रात 450 ते 460 एमएलटी पाणी उचलले जाते. शहरातील बहुतेक भागात दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा केला जातो. या पद्धतीने वर्षभर पाणीपुरवठा केल्यास पुढील वर्षी जुलै 2017 पर्यंत पाणी पुरेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसामुळे पवना धरण 100 टक्के भरले होते. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने साठा कमी झाला होता. सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसाने पुन्हा धरण 100 टक्के भरून वाहत आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असूनही दिवसातून एकच वेळ पुरवठा केला जाणार आहे. दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. गणेश विसर्जनानंतर धरण क्षेत्रात सलग काही दिवस पाऊस झाल्याने धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले होते.