उरी हल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या सर्जिकल स्ट्राईकने अनेक क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातच काही सेलिब्रिटीनी आपली मते मांडली होती. काहींच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला होता. आता अभिनेता अक्षय कुमार यानेही याप्रकरणावर आपले मत मांडले असून त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अक्षयने या सर्जिकल स्ट्राईकनंतर वाद निर्माण करणार्यांना चांगलीच चपराक दिली आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की, मी एक सेलिब्रिटी नाहीतर एका सैनिकाचा मुलगा म्हणून बोलत आहे. काही दिवसांपासून बातम्यांमध्ये मी आपल्याच लोकांचा वाद पाहत आहे. कोणी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहे तर कोण कलाकारांवर बंदीची मागणी करत आहे. पण शहिद झालेल्या जवांनाबदल कोणच बोलत नाही.
अक्षय म्हणतो की, प्रथम याचा विचार करा की, कोणीतरी आपल्यासाठी सीमेवर शहीद झाले आहे. २४ वर्षाचा जवान नितीन यादव शहीद झाला आहे. त्याच्या परिवाराला कोणता चित्रपट रिलीज झाला याने फरक पडत नाही, त्यांना कलाकारांच्या बंदीने फरक पडत नाही. आता त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी आहे. सैनिक आहेत म्हणून आपण आहोत, सैनिक आहेत म्हणून हिंदूस्थान आहे.