पावसाचा जोर वाढताच मुंबईत डेंग्यू, मलेरियाची साथ वाढू लागली असून, एकट्या सप्टेंबर महिन्यात मुंबईत तापाचे सुमारे 15 हजार रुग्ण आढळले. डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही तुलनेने अधिक आहे. यंदा मलेरियाचे 910, लेप्टोचे 38, तर डेंग्यूचे 382 रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या तब्बल 4242 इतकी आहे. मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असून 2011-12 या वर्षात डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 62 होती हा आकडा आता दुपटीहून अधिक वाढला आहे. व्हायरल फिव्हरने मुंबई अक्षरश: फणफणली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पालिका आणि खासगी रुग्णालयातील रुग्णकक्ष तुडुंब भरले असून नवीन रुग्णांना दाखल करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. शीव रुग्णालयात 5, 6, 7 , 7 अ आणि महिलांसाठी 19, 20 रुरग्णकक्षात साथीच्या आजारांचे रुग्ण दाखल आहेत. यातील 40 ते 50 रुग्णांची मर्यादा असलेल्या कक्षात शंभरहून अधिक रुग्ण दाखल आहेत. केईएम रुग्णालयातही अशीच स्थिती आहे. सप्टेंबर महिन्यात पालिकेच्या रुग्णालयात 2 रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून खासगी रुग्णालयांची डेंग्यूमुळे मृत्यू झालेली संख्या अधिक असण्याची भीती आहे.
पालिकेच्या किटकनाशक विभागाने मलेरियासाठी 55 हजार इमारतींची पाहाणी केली. डेंग्यूच्या अळ्या शोधण्यासाठी एक लाख चाळी, इमारतींची पाहणी केली. 19 लाख 60 हजार ठिकाणे तसेच झोपड्यांमध्ये धूर फवारणी केली. त्याप्रमाणे 30, 167 उंदीर मारण्यात आले.
