भाव करण्याची अनोखी स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांना सेलिब्रेटी बनवणारा गेमशो म्हणून ‘विकता का उत्तर’ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा गेम शो ७ऑक्टोबर पासून शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडे सात वाजता स्टारप्रवाहवर सुरू होत आहे. रितेश देशमुख या शोद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेमशो आले. मात्र, ‘विकता का उत्तर’ हा त्या सर्वां पेक्षा नक्कीच वेगळा आहे. जिंकण्यासाठी भाव करावा लागणा-या अनोख्या संकल्पनेवर हा गेम शो बेतला आहे. मराठी माणसाला व्यवसाय कळत नाही, मराठी माणसांत जिंकण्याची वृत्ती नाही अशा सगळ्या टीकांना हा गेम शो उत्तर देणार आहे. बुद्धिमत्ता आणि भाव करण्याचं कौशल्य या गेम शो मध्ये पणाला लावावं लागणार आहे. त्यासाठी स्पर्धकाला भाव करणाऱ्या कलाकारांशी चुरस करावी लागेल. या गेम शोचं वेगळेपण म्हणजे, यातील स्पर्धकाबरोबरच त्याच्याबरोबर उत्तरासाठी भाव करणारी व्यक्ती ही जिंकू शकणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस स्पर्धकापेक्षा भाव करणारी व्यक्ती जास्त रक्कम जिंकू शकते. त्यामुळे भाव करण्याचं कौशल्य असलेले स्पर्धक’ आता थांबायचं नाय’ म्हणत या गेम शो मध्ये सहभागी होत आहेत. आता या खेळात नेमकं काय घडतं, कोण जास्त रक्कम जिंकतं, त्यासाठी ही लाखो रुपये जिंकण्याची संधी देणारा गेम शो पहावा लागेल.
भारतीय टेलिव्हिजनला एकाहून एक सरस गेमशो दिलेल्या सिद्धार्थ बसू यांच्या बिग सिनर्जीने ‘विकता का उत्तर’ चं आरेखन आणि निर्मिती केली आहे. या गेम शोच्या निमित्तानं लेखकांची उत्तम भट्टी जमून आली आहे. अभिनेता-लेखक-दिग्दर्शक असलेला ह्रषिकेश जोशी, कवी-गीतकार वैभव जोशी, अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे आणि लेखिका पल्लवी करकेरा हे चौघंया कार्यक्रमाचं लेखन करत आहेत.
बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडून रितेश देशमुख दणक्यात छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. छोट्या पडद्यावरील पदार्पणाबाबत आणि गेम शो बाबत रितेश देशमुख म्हणाला की,’ छोट्या पडद्यावर पदार्पण करणं माझ्यासाठी आनंददायी आहे. तसंच हे पदार्पण स्टार प्रवाहवरून होणं माझ्यासाठी खास आहे. हा खेळ नक्कीच वेगळा आहे. त्या बरोबरच मला महाराष्ट्रातल्या सर्व सामान्यांशी संवाद साधता येणार आहे, त्यांच्या भावभावना जाणून घेता येणार आहे ही आनंदाची बाब आहे. एकूणच, छोट्या पडद्यावर येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’