राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त खास जादा गाड्यांची सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून दिवाळीनिमित्त गावी जाणार्या नागरिकांसाठी सोईस्कर ठरणार आहे. वल्लभनगर आगारातून या वर्षी दिवाळीनिमित्त 35 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून, बुधवार, दि. 26 ऑक्टोबरपासून या जादा गाड्या सुरू होणार असल्याची माहिती आगार प्रमुख अनिल भिसे यांनी दिली आहे.
गणेशोत्सवामध्ये 42 गाड्या सोडण्याचे नियोजन केल्यामुळे शहरातून कोकणात जाणार्या नागरिकांसाठी या जादा गाड्या खूप फायदेशीर ठरल्या होत्या. गणेशोत्सवाच्या काळात 42 जादा गाड्यांचे नियोजन होते; मात्र नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 72 जादा गाड्या वल्लभनगर आगारातून सोडण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवाच्या काळात वल्लभनगरला आठ लाखांचे भरघोस असे उत्पन्न मिळाले होते. अगदी त्याच पद्धतीने दिवाळीसाठी जादा गाड्यांचे अचूक नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात दिवाळीनिमित्त वल्लभनगर येथून जाण्यास गाडी उपलब्ध असणार आहे.
त्यामध्ये बीड, खेड, कोल्हापूर, लातूर, उमरगा या ठिकाणी बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये बुधवार, दि.26 ऑक्टोबर आणि गुरुवारी (दि.27) बीडसाठी रात्री साडेआठ वाजता, खेडसाठी बुधवार, दि.26 ते शनिवार, दि.29पर्यंत दररोज दुपारी दोन वाजता आगारातून बस निघणार आहे. कोल्हापूरसाठी बुधवार, दि.26 ते शनिवार, दि.29पर्यंत दररोज रात्री 10.31 आणि रात्री 11.16 वाजता; तसेच शुक्रवार, दि.28, शनिवार, दि.29 रात्री 11.31 वाजता, शनिवार, दि.29 रात्री 11.46 वाजता वल्लभनगर आगारातून बस रवाना होणार आहे. लातूरसाठी बुधवार, दि.26 ते शनिवार, दि.29पर्यंत दररोज रात्री 9.46 वाजता; तसेच शुक्रवार, दि.28 व शनिवार, दि.29 रात्री 10.16, रात्री 10.31 वाजता रवाना होणार आहे. उमरगासाठी बुधवार, दि.26 ते शनिवार, दि.29पर्यंत दररोज रात्री 9.31 वाजता; तसेच गुरुवार, दि.27 ते शनिवार, दि.29पर्यंत रात्री 11.01, रात्री 11.16 वाजता वल्लभनगर आगारातून रवाना होणार आहे. यासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध असल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले.