राज्यातील अग्निशमन दलाकडून पूरस्थिती हाताळण्यासाठी आतापर्यंत चाळीस जवांनाना व अधिकार्यांना प्रशिक्षित केले आहे. आता पोलिस, होमगार्ड आणि नागरीसंरक्षकांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी अग्निशमन दलाने घेतली आहे. प्रशिक्षण 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस जेम्स जॉर्डन लाव्हेल्ली व इतर अधिकारी उपस्थित होते.
मेनन यांनी सांगितले, की यंदा प्रशिक्षण प्राप्त करणारी ही गोव्यातील चौथी तुकडी आहे. या तुकडी 11 जणांचा समावेश होता. जागतिक पातळीवरील प्रशिक्षक ज्यांना गेले 40 वर्षांचा अनुभव आहे, असे जेम्स जॉर्डन यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या प्रशिक्षण प्राप्त केलेले प्रशिक्षार्थी पोलिस आणि होमगार्ड यांना प्रशिक्षित करणार आहेत.
राज्य आपत्ती प्रतिसाद विभागाकडून अग्निशमन दलाच्या जवानांची निवड केली जाते. पूरग्रस्तस्थिती निर्माण झाल्यास कशा पद्धतीने हाताळावी याचे प्रशिक्षण निवड झालेल्या जवांना दिले जाते. मुंबई येथील स्पेशल रेस्क्यु ट्रेनिंग अकादमी प्रा. लि.द्वारे जवानांना प्रशिक्षित केले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ पूरग्रस्त स्थिती उद्भवल्यास होतो, असे मेनन यांनी सांगितले.
निवड झालेल्या जवानांना सहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणावेळी 8 मिनिटात 300 मिटर पोहून जावे लागते. जवानांनामध्ये जागृती करणे, तांत्रिक गोष्टी समजावणे, पोहण्याची पद्धत कशी असावी, दोरी बांधणे आदी गोष्टी शिकवल्या जातात, असेही मेनन यांनी सांगितले.