मराठवाड्यावर आभाळ फाटले, शेतकरी उद्ध्वस्त

मराठवाड्यावर आभाळ फाटले आहे. बीड, लातूर, धाराशीव व नांदेड जिल्हे पाण्याखाली गेली आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळे नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. शेकडो गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांना पाण्याने वेढल्यामुळे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण’च्या टीमला बचावकार्यासाठी पाचारण केले आहे. रविवारी रात्रीपर्यंत नांदेड, लातूर जिल्ह्यातील शेकडो जणांना पुरातून बाहेर काढण्यात आले, तर या मुसळधार पावसात खरीप हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मराठवाड्यातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली. संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गही पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आला आहे. तर संंभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री उशिरा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील आरधवाडीत भिंत कोसळून दोन जण ठार झाले. लातूर व पाटोदा तालुक्यातील अनेक तलाव फुटले आहेत. – लातूर जिल्ह्यात पुरात वाहून गेलेले मावलगावातील १०, रेणापूरमधील ९ आणि नळेगाव येथील १५ जण एनडीआरएफच्या जवानांमुळे सुरक्षित – नांदेड जिल्ह्यात बोळेगाव नदीपात्रात तीन जण वाहून आले. डोंगरगावातील मन्याड नदीच्या पुरात २४ जण अडकले होते. या सर्वांची सुखरूप सुटका एनडीआरएफच्या पथकाने केली. कुंद्राळा तलावात अडकलेल्या मारुती सोनपल्ले या तरुणाचीही सुटका. – धाराशीव जिल्ह्यात पारगावमधील मांजरा नदीला पूर, ईट परिसरातील अनेक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. – मराठवाड्यातील दहा धरणे ओव्हरफ्लो माजलगाव, मांजरा, तेरणा, सिना कोळेगाव, दुधना, मनार, पेनगंगासह सर्व धरणे भरली असून येलदरी व सिद्धेश्‍वरही ५० टक्क्यांच्या वर गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *