कॉफी… हा नुसता शब्द ऐकला तरी ताजेतवाने व्हायला होते. कॉफीच्या दरवळणाऱ्या वासावरुन अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. परदेशातून आलेली कॉफी कधी घरची आणि भारतीय झाली हे कोणालाच कळले नाही. पण, हीच कॉफी पुढच्या ६४ वर्षांत इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कॉफीच्या पिकासाठी एका विशिष्ट प्रकारचे तापमान आणि हवामान आवश्यक असते. पण, ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणीय बदलांमुळे कॉफीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. हा परिणाम, परदेशातीलच नाही तर भारतीय कॉफीवरही होताना दिसून येतो आहे.
‘अॅरेबिका’ आणि ‘रोबस्टा’ हे कॉफीच्या दोन्ही प्रकारांना जगभरातून पसंती मिळते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्रामुख्याने याच प्रकारांवर परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, सतत होणाऱ्या वातावरणीय बदलांचा थेट परिणाम कॉफीच्या पिकांवर होताना दिसत आहे. जगभरात होत असलेले परिणाम भारतामध्येही दिसून आले आहेत. २००२ ते २०११ या १० वर्षांच्या कालावधीत भारतात होणाऱ्या कॉफीच्या पिकांमध्ये ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मानवालाही वाढणारे तापमान सहन होत नाही. मानवी गुणधर्मामुळे मानव बदलत्या निसर्गाशी जुळवून घेतो आहे. पण, बदलत्या निसर्गाशी जमवून घेणे झाडाझुडपांना, पिकांना शक्य नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम सर्वच पिकांवर कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पण, वातावरणातील हे बदल होत राहिल्यास अथवा वाढल्यास कॉफीच्या पिकाच्या जमिनीची गुणवत्ता कमी होत जाणार आहे. त्यानंतरी या ग्लोबल वॉर्मिंगला मानवाने आळा घातला नाही. तर, पुढे जाऊन २०८० पर्यंत कॉफीचे पिक येणेच बंद होईल, असे शास्त्रज्ञांनी सर्वेक्षणात नमूद केले आहे.
हा भविष्यकाळ आहे, कॉफी नष्ट कशी होईल, असा याक्षणी विचार करणे अत्यंत चुकीचे ठरेल. कारण, ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आताही कॉफीच्या पिकावर दिसायला लागले आहे. सतत वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे कॉफीच्या उत्पादनात घट झालीच आहे. तर, वाढत्या तापमानामुळे कॉफीचा फ्लेवर आणि वास कमी व्हायला लागला आहे. परिणामी कॉफीचा दर्जा कमी होता चालला आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती असल्यास नक्कीच पुढच्या ६४ वर्षांत कॉफी नामशेष होऊ शकते. याचा आत्ताच गांभीर्याने विचार व्हायला हवा.