उरी हल्ल्याचा भारतीय सैन्याने वचपा काढल्यानंतर काल पाकिस्तानमधला जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली. उरी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने तिळपापड झालेल्या सईदने सर्जिकल स्ट्राईक काय असतात, हे आम्ही भारताला दाखवू अशी धमकी दिली आहे.
शुक्रवारी फैसलाबादमध्ये सईदच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्याने भारताला धमकी देताना भारतीय माध्यमांवरही आगपाखड केली. तो म्हणाला की, ” उरी हल्ल्यानंतर भारतीय माध्यमांनी केवळ त्यांचे 20च जवान मारले गेल्याचा दावा केला. पण हे साफ खोटं आहे. या हल्ल्यात 177 हून अधिक भारतीय ठार झाले आणि इतर अनेकजण जखमी झाले. आमच्यावर सूड उगवण्यासाठी एक झलक दाखवण्यात आली. यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक कशाला म्हणतात, हे भारताला दाखवून देऊ असं तो म्हणाला. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही लक्ष्य केलं.
काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांच्या 71 व्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्व देशांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने पाकिस्तानला दरडावलं होतं. दहशतवादाला पोसणाऱ्या देशांना वाळीत टाकण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. तसंच भडकवणारी भाषणं करुन काश्मीर बळकावण्याची स्वप्न पाहू नका असा इशाराही पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत सईदसारख्या दहशतवाद्यांना दिला होता.
तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनी हाफीज सईदला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेलं आहे. तरीही त्याच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी पाकिस्तान सरकारने त्याला मोकळं रान दिलंय. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याचं ढळढळीत सत्य पुन्हा जगासमोर आलं.