जगभरातील विशेषकरुन सीमेपलीकडचे जे प्रतिभावंत कलाकार आहेत त्यांच्यासाठी भारतीय चित्रपटसुष्टी खुली आहे. ते भारतीय चित्रपटांमध्ये काम करु शकतात. पण इथे काम करायला कोणाला परवानगी द्यायची याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे असे मत अभिनेता सैफ अली खानने व्यक्त केले.
सैफने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलिवूडमध्ये काम करण्याचे समर्थन केले आहे. उरीमध्ये लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. मनसेने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली.
४८ तासात भारत सोडून जा अन्यथा तुमच्या चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडू अशी धमकी मनसेने पाकिस्तानी कलाकारांना दिली. त्यापार्श्वभूमीवर सैफने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले आहे. आम्ही कलाकार आहोत. आम्ही प्रेम आणि शांतीबद्दल बोलतो. पण इथे कोणी काम करावे आणि कोणी करु नये याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे असे जीक्यू मेन ऑफ द इयर पुरस्कार सोहळयात बोलताना सैफ म्हणाला.
