कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील हा पहिलाच मोर्चा असून, गर्दीचे जिल्ह्यातील सर्व विक्रम मोडीत काढून पंधरा लाखांवर लोक या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. या मोर्चासाठी हळूहळू नागरिकांती गर्दी जमू लागली असून राम मंदिर चौकात स्वयंसेवकांचे नियोजन सुरू आहे. सामान्य नागरिकांसाह विश्वजित कदम, माजी मंत्री जयंत पाटील हेही या मोर्चास्थळी उपस्थित आहेत.
सांगलीतील या मोर्चाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राममंदिरापर्यंत मोर्चाचा प्रमुख मार्ग आहे. मोर्चात सहभागी होण्याचा क्रमही निश्चित करण्यात आला असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मोर्चाच्या प्रमुख मार्गावर दोन हजार स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. मोर्चाच्या मार्गावर पिण्याचे पाणी, आरोग्य पथक, डॉक्टर तसेच रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण मोर्चा मार्गावर तसेच शहरात रेडिओच्या माध्यमातून वायरलेस ध्वनिक्षेपक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सोमवारपासूनच ही यंत्रणा कार्यान्वित झाली.