अपघात रोखण्यासाठी रेल्वेचा अ‍ॅक्शन प्लॅन

पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या अपघातात दरवर्षी सुमारे 30 हजार प्रवासी अपघातांना बळी पडतात. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पश्‍चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लान तयार केला आहे. त्यानुसार येत्या तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मार्च 2018 पर्यंत दोन्ही रेल्वे मार्गांवरील सर्वच प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार असून मार्च 2019पर्यंत रेल्वे मार्गालगत भिंतीचे कुंपण उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी दिली.

मध्य व पश्‍चिम रेल्वे मार्गावर दरवर्षी वर्षाला 30 हजार प्रवासी अपघाताला बळी पडतात. रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे, रेल्वे खाली सापडणे आदींमुळे प्रवाशांचा अपघात होतो. त्यापैकी 10 हजार प्रवाशांचा  मृत्यू होतो, तर तेवढेच प्रवासी गंभीर जखमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताला आळा घालण्यासाठी मध्य व पश्‍चिम रेल्वेने ठोस उपाययोजना करावी म्हणून शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीसाठी संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीचे निमंत्रक खासदार किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेतला होता. नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर, गृहविभागाचे प्रधान सचिव रजनिश शेठ यांच्यासह मध्य रेल्वे, पश्‍चिम रेल्वेबरोबरच महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी, रेल्वे पोलीस, मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, आरपीएफचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *