एकेकाळी नाटक-चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही आघाडय़ांवर कार्यरत असलेल्या अभिनेत्री रीमा यांनी ‘डेली सोप’चे दळण असलेल्या मालिकांची धास्तीच घेतली होती. एकाच विषयांभोवती फिरणाऱ्या या मालिकांचा कंटाळा आल्याने नऊ वर्ष टेलिव्हिजनपासून दूर राहिलेल्या रीमा यांनी महेश भट्ट यांच्या ‘नामकरण’ या मालिकेतून पुन्हा छोटय़ा पडद्यावर प्रवेश केला आहे.
अवनी या लहान मुलीच्या दृष्टिकोनातून निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी जुनाच असलेला पण पुन्हा ऐरणीवर येऊ शकेल, अशा मुद्दय़ाला हात घातला आहे. लग्नाआधी वडिलांचे आणि लग्नानंतर पतीचे नाव लावणाऱ्या स्त्रीची खरी ओळख काय? तिचे अस्तित्व काय? या विषयावर एका लहान मुलीच्या नजरेतून त्यांनी मांडणी केली आहे.
या मालिकेसाठी मुळात महेश भट्ट यांनी मांडलेला विषय मनापासून समजून घेणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी स्वत: कार्यशाळा घेतली. त्यांच्याबरोबर या विषयावर चर्चा झाल्या, सातत्याने त्यांच्याकडून नवनवे मुद्दे समजून घ्यायचे, आपली मते मांडायची ही प्रक्रिया राबवली गेली. खरेतर, नाटकासाठी अशा प्रकारची लेखन-वाचन-चर्चा-तालीम अशा प्रक्रि येतून कलाकारांना जावे लागते. ‘नामकरण’साठी आम्हाला या पूर्ण प्रक्रियेतून जावे लागले. मालिकेसाठी अशा प्रकारची मेहनत घेणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.