वीर जवान अमर रहे
साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
हजारोंच्या उपस्थितीत कुळमेथे यांच्यावर अंत्यसंस्कार
यवतमाळ : उरी येथे झालेल्या लष्करी तळावरील हल्ल्यात राज्यातील चार वीरांना शूरमरण आले. त्यातील नाशिकच्या संदीप ठोक यांच्यावर सोमवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यवतमाळच्या पुरड येथील विकास कुळमेथे यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा नागपूर येथे आणल्यानंतर मंगळवारी हेलिकॉप्टरने चंद्रपूर आणि तेथून दुपारी त्यांच्या मूळ गावी पुरड येथे आणण्यात आले. या वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परिसरातील अनेक गावांतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
‘अमर रहे’च्या जयघोषात चंद्रकांत गलाडेंना निरोप
सातारा : शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचे पार्थिव सोमवारी मध्यरात्री सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्या पार्थिवाचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे आणि शिक्षण सभापती सतीश चव्हाण यांनी अंत्यदर्शन घेतले. आज सकाळी माण तालुक्यातील शहीद चंद्रकांत यांची त्यांच्या मूळ गावी जाशी येथे फुलांनी सजविलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. गावकर्यांनी चौकाचौकांत फ्लेक्स लावले होते. ‘अमर रहे अमर रहे, चंद्रकांत गलंडे अमर रहे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, अशा घोषणा देण्यात आल्या. लष्कराच्या १४ जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैर्या झाडून मानवंदना दिली. शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचे बंधू केशव यांनी चितेला भडाग्नी दिला.
पंजाब जानराव उईके अनंतात विलीन
अमरावती : विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी नागपूर येथील भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने बेलोरा विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव शासकीय वाहनाने खंडेश्वर येथे नेण्यात आले. ओंकारेश्वर परिसरातील एका मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पुलगाव येथील जवानांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. त्यांच्या अंतिम दर्शनाला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आमदार, पालकमंत्री उपस्थित होते.