आयुर्वेद हे वेदाचेच एक उपांग असल्याने आणि ‘आरोग्य’ धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांना साध्य करण्याचे एकमेव साधन असल्याने वेदांमध्ये आरोग्याविषयी बरीच माहिती दिलेली आढळते. आयुर्वेदात जसे उपचारांचे अनेक प्रकार समजावले आहेत, त्याप्रमाणे वेदातही चिकित्सेचे प्रकार सांगितलेले आढळतात. विशेषतः अथर्ववेदात ‘अथर्व’ चिकित्सा सांगितली आहे. ही चार प्रकारची आहे.
१) आथर्वणी ः जप, दान, होम, स्वस्तिवाचन यांच्या माध्यमातून केली जाणारी म्हणजे वातावरणात बदल करवून होणारी चिकित्सा.
२) आंगिरसी ः मानसिक शक्तीशी संबंधित चिकित्सा म्हणजे बाह्यवातावरणाच्या बदलातील स्वीकार करण्याची चिकित्सा
३) दैवी ः वायू, जल, पृथ्वी वगैरे निसर्गतत्त्वांच्या मदतीने केली जाणारी म्हणजे पांचभौतिक व शक्तीचे गुण शरीरात स्वीकारण्याची चिकित्सा.
४) मानुषी ः औषधांच्या मदतीने केली जाणारी.
मात्र या सर्व चिकित्सा फलद्रूप होण्यासाठी प्राणाची प्रेरणा मिळत राहणे आवश्यक असते.
आथर्वणीरांगिरसीर्दैनीमनुष्यजा उत ।
ओषधयः प्रजायन्ते यदा त्वं प्राण जिन्वसि ।।
हे प्राणा, जोवर तू प्रेरणा देतो आहेस, तोवर आथर्वणी, आंगिरसी, दैवी आणि मानुषी या चिकित्सा फळ देतात.
वेदांमध्ये रोगाची तीन कारणे सांगितली आहेत.
१) शरीराच्या आत साठलेली विषद्रव्ये. विषाला ‘यक्ष्म’ असा शब्द वापरला आहे.
२) कृमी – अन्न, जल, दूध आदी द्रव्यांमधून जेव्हा शरीरात सूक्ष्म जीवजंतू, जीवाणू, विषाणू पोचतात तेव्हा रोग होतात.
३) वात-पित्त-कफ – या तिघांच्या विषमतेमुळे रोग होतात.
आयुर्वेदाला ‘अष्टांग आयुर्वेद‘ म्हटले जाते, कारण आयुर्वेदाच्या आठ मुख्य शाखा आहेत. वेदांमध्येही या अष्टांगाचे उल्लेख सापडतात.
वेदांमधले शल्यतंत्र – तुटलेली हाडे जोडणे, तुटलेले अंग पुन्हा जोडणे, शरीरापासून वेगळे झालेले मांस, मज्जा, धातूंना पुन्हा स्वस्थ करणे. रक्तस्राव होत असल्यास त्यावर पट्टी बांधणे किंवा वाळूच्या थैलीने दाब देणे वगैरे उपचार वेदात सापडतात. गळू झाले असल्यास त्याचे वेधन, छेदन करण्याचाही उल्लेख सापडतो.
वेदांमधील अगदतंत्र – सर्पविषासंबंधी अनेक मंत्र अथर्ववेदात आहेत. विषयुक्त आहाराचाही उल्लेख आहे.
वेदांमध्ये रसायन – सर्वच वेदांमध्ये आयुष्यवर्धनासाठीचे मंत्र तसेच सूक्ते आहेत. रसायनामुळे वयःस्थापन होते, आयुष्य वाढते, शक्ती वाढते आणि रोगाला दूर करण्याची शक्ती प्राप्त होते.
यासाठी ‘ब्रह्मचर्य’ हा एक उत्तम उपाय आहे.
वेदांमध्ये वाजीकरण – वाजीकरणाचा उपयोग उत्तम प्रजा उत्पत्तीसाठी होत असतो. अथर्ववेदात गर्भाधानसूक्ताचा उल्लेख आहे.
वेदांमध्ये कौमारभृत्यतंत्र – सुखकर प्रसवासाठीच्या प्रार्थना अथर्ववेदात दिलेल्या आहेत.
वेदांमध्ये स्वस्थवृत्त – दोन ऋतूंमधला जो काळ असतो त्यात रोगराई पसरण्याचा सर्वाधिक संभव असतो. यावर उपाय म्हणून वेदकाळात भैषज्ययज्ञ केले जात असत. यासाठी चार प्रकारची सामग्री जमवली जात असे.
१) सुगंधित द्रव्य ः कस्तुरी, केशर, अगरू, चंदन, वेलची, जायफळ, जायपत्री वगैरे
२) पुष्टिकारक ः तूप, दूध, फळे, कंद, गहू, तांदूळ, उडीद वगैरे धान्य
३) मिष्टान्न ः साखर, मध, मनुका वगैरे
४) रोगनाशक द्रव्य ः कुष्ठ वगैरे औषधी वनस्पती
यजुर्वेदात सुवर्णाबद्दल म्हटलेले आहे, सोने आयुष्यासाठी हितकर, कांती वाढविणारे, समृद्धी देणारे, सर्व रोगांचे भेदन करणारे आणि तेजस्विता देणारे आहे. सोन्यापासून राक्षस, पिशाच्च किंवा कोणताही रोग वाचू शकत नाही. जी व्यक्ती सुवर्णाचे सेवन करते आणि जी व्यक्ती दुसऱ्याला सुवर्णाचे सेवन करवते, दोघांना दीर्घायुष्याचा फायदा होतो.
यजुर्वेदात ओषधिसूक्त दिलेले आहे. यात औषधी वनस्पतींना उद्देशून अनेक मंत्र आहेत, मंत्रांद्वारा त्यांची नाना प्रकारे प्रार्थना केलेली आहे. औषधी वनस्पतींना ‘माता’ म्हणून संबोधले आहे व त्यांची पुढील मंत्राद्रारा प्रार्थना केली आहे, म्हणजेच वनस्पतींच्या गुणदर्शनाचे चिंतन केलेले आहे.
अवपतन्तीरवदन् दिव ओषधयस्परि ।
यं जीवमश्नवामहै न स रिष्यति पूरुषः ।।….यजुर्वेद
आकाशातून पृथ्वीवर अवतीर्ण झालेली ओषधि, तू ज्या व्यक्तीजवळ असशील, तिचा कशानेही नाश होणार नाही.
प्राचीन काळी फक्त मनुष्याच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर हत्ती, गाय, घोडा वगैरे पशूंसाठी सुद्धा औषधी वनस्पतींचा वापर केला जात असे. वनस्पती तोडतानासुद्धा मानव व पशुपक्ष्यांच्या आरोग्यासाठी ‘आम्ही तुला खणत आहोत, तू तुझ्या शक्तीनिशी आमच्याकडे ये आणि आमच्या रोगांचा नाश कर’ अशी प्रार्थना करावयास सांगितली आहे. वैद्याकडे सर्व वनस्पती असायला हव्यात असेसुद्धा वेदात सांगितलेले आहे.
ज्याप्रमाणे राजाकडे विविध प्रकारच्या समित्या असतात आणि त्यांच्या मदतीने तो सर्व राज्यकारभार पाहतो त्याप्रमाणे ज्या वैद्याकडे विविध वनस्पती असतील तो सर्व राक्षसांचा (जीवजंतू, विषाणू, जीवाणू वगैरे) आणि रोगांचा प्रतिकार करू शकतो.