राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल हवामान तयार झाले आहे. बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात अति जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
बंगालच्या उपसागरात ओडिशा, आंध्र प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर गुजरात आणि परिसरावरही ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वार्यांची स्थिती आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनार्यासह कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगांची दाटी झाली आहे. तर विदर्भ, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागरात ढग जमा झाले आहेत. शनिवारपर्यंत कोकणात, शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात अति जोरदार, तर शुक्रवारपर्यंत मराठवाड्यात आणि गुरुवारपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.