जम्मू-कश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर अवघ्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भयंकर हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्याच्या घटनेने अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली. पाकड्यांचे हल्ले किती काळ सहन करणार, आणखी किती जवानांचे बळी देणार, असा संतप्त सवाल देशभरातून विचारला जात आहे, तर आम्हाला कसलीही मदत नको, पण पाकिस्तानवर सूड उगवा नाहीतर बांगड्या भरा असा आक्रोश शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी केला आहे. महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या १८ जवानांमध्ये महाराष्ट्रातील चार सुपुत्रांचा समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चंद्रकांत शंकर गलांडे, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव-खंडेश्वरचे विकास जानराव उईके, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खंडनगळीचे संदीप ठोक हे काल शहीद झाले होते. हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळचे विकास जनार्दन कुडमेथे यांना आज वीरमरण आले. महाराष्ट्रातल्या या सुपुत्रांच्या वीरमरणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.