नियंत्रण सुटल्यानेबस तलावात-३५ ठार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस तलावात कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३५ जण ठार, तर २० जण जखमी झाले आहेत. बेन्निपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसईठा चौकाजवळ हा अपघात झाला. सुमारे ६५ प्रवाशांना घेऊन जाणारी ही खासगी बस मधुबनीहून सीतामढीला जात असताना महामार्गावर हा अपघात झाला. काही प्रवासी तलावातून पोहून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. भरधाव जात असणार्‍या या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यालगतच्या तलावात कोसळल्याचे सांगण्यात येते. यामध्ये ३५ जण ठार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असले तरी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. क्रेनसच्या साहाय्याने तलावात पडलेली बस बाहेर काढण्यात आली असून, तलावाच्या पाण्यात मदत पथकाच्या साहाय्याने शोधकार्य सुरू आहे. अपघाताबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला असून, अपघाताचे कारण शोधण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. अपघातात मरण पावलेल्यांचे कुटुंबीय, तसेच जखमींना आवश्यक ती मदत पुरवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मधुबनी बस दुर्घटनेचे वृत्त ऐकून आपल्याला दु:ख झाल्याचे म्हटले आहे, तसेच मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगत मोदींनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *