रेल्वेचे तत्काळ तिकिट आता सकाळी १० ते ११

रेल्वेच्या वातानुकूलित व द्वितीय श्रेणी डब्यांसाठीच्या तत्काळ तिकिटांसाठी वेळ निश्चित करून दिल्याने आणि सुरुवातीला अर्धा तास एजंटांना तिकीट बुकिंगवर बंदी घातल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून, दोन-दोन तास रांगेत थांबावे लागणार नाही.

तत्काळ तिकिटासाठी यापूर्वी सकाळी १० ते १२ या वेळेत तिकीट दिले जात होते. मात्र, आता नवीन बदलानुसार वातानुकूलित डब्यांच्या तत्काळ आरक्षणासाठी सकाळी १० ते ११ ही वेळ दिली आहे, तर स्लीपर व इतर डब्यांसाठी सकाळी ११ नंतर तत्काळ आरक्षण करावे लागणार आहे. ही नवीन वेळ सोमवारपासून सर्वत्र लागू झाली.

जुन्या नियमानुसार सकाळी १० पासून वातानुकूलित व अन्य तिकिटांसाठी रेल्वे रिझर्व्हेशन काउंटरवर गर्दी होत होती. आता वातानुकूलित डब्याचे तिकीट पाहिजे असलेले नागरिक १० ते ११ आणि अन्य डब्यांचे तिकीट हवे असलेले ११ नंतर तिकीट काउंटरवर येतील. त्यामुळे काउंटरवरील गर्दी नाहीशी होण्यास मदत होणार आहे; तसेच सकाळी १० ते ११ आणि ११ ते १२ या दोन्ही वेळेला सुरुवातीचा अर्धा तास एजंट तिकीट बुक करू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना सहजपणे व जास्त वेळ न जाता तिकीट मिळण्यास मदत होणार आहे.

याबरोबरच सुटी किंवा गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. या काळात वेटिंग तिकीटधारकांची संख्या जास्त असते. परिणामी रेल्वे भरलेल्या असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रवासी संख्या विचारात घेऊन ‘तत्काळ’ रेल्वे सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

५० टक्के रक्कम परत देण्याचा निर्णय

रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना तिकीट रकमेच्या ५० टक्के रक्कम परत देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या एक जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी तत्काळ तिकीट बुक केल्यानंतर संबंधित गाडीने प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जात नव्हते; तसेच तिकिटाचेही हस्तांतर होत नव्हते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *