आयटी क्षेत्राचे दिवाळे वाजले : नायर

आयटी क्षेत्राचे दिवाळे वाजले असून ऑटोमेशनमुळे नोक-यांची संधी आखडत चालली आहे, असे मत प्रख्यात अंतराळ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी व्यक्त केले आहे. भारतीय कंपन्यांनी आता उच्च पदांच्या नोक-या व देशांतर्गत बाजारपेठेवर भर द्यावा, असे ते म्हणाले.

दोन वर्षापूर्वीच आपण तथाकथित आयटी क्षेत्राचे दिवाळे वाजणार असल्याचे भाकीत वर्तवले होते आणि आता तेच आपण पाहत आहोत, असे नायर म्हणाले. गेल्या वर्षी तरुण आयटी इंजिनीअर्सची भरती रोडावली होती आणि यंदा तर अनेक ठिकाणी ती शून्यावर आली आहे. याचा अर्थ तशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी आता नाहीत. भारतातून ज्या प्रकारचे जॉब केले जातात ते ऑटोमेशनसाठी योग्य आहेत. डेटाबेस व्यवस्थापन यासारखी कामे पूर्णपणे ऑटोमेटेड केली जाऊ शकतात आणि सर्व्हर्स आता जास्तीत जास्त शक्तिशाली बनवले जात आहेत. त्यामुळे आता मानवीय हस्तक्षेपाची गरजच नाही, असे नायर यांनी स्पष्ट केले.

संगणकाच्या सहाय्याने मशिनटुल्सचा वाढता वापर व कारखाने तसेच उत्पादन प्रकल्पांतून रोबोंचा उपयोग यामुळे मानवीय कामगारांची गरज कमी होत चालली आहे. या परिस्थितीत भारताला जगायचे असेल तर उच्च पदांवरील कामांकडे वळावे लागेल, असे त्यांनी सुचवले आहे. आमच्याकडे ती क्षमता आहे, आमचे तरुण खरोखर बुद्धिमान आहेत. पण विज्ञान व तंत्रज्ञान यातील संधींकडे आपण पाहतच नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक जण काहीतरी सामान्य दर्जाचे काम करून समाधान मिळवू पाहत आहे. आपण स्वत:लाच आव्हान दिले नाही तर आपल्याला सोडून जग पुढे जाईल, असा इशारा नायर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *