मोबाईल टॉवरच्या लहरींचा आरोग्यावर दुष्परिणाम नाही

मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या लहरींचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, असे सरकारतर्फे आज स्पष्ट करण्यात आले. एवढेच नव्हे, तर या मुद्द्यावर जनमानसात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेच्या सदस्या भावना गवळी यांनी दूरसंचार मंत्रालयाशी संबंधित विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. 
 
मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची जनतेमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी सरकार काय करते आहे, असा प्रश्न भावना गवळी यांनी विचारला होता. मंत्री मनोज सिन्हा म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू एच ओ) गेल्या तीस वर्षांत जगभरात प्रसिद्ध झालेल्या 25 हजारहून अधिक लेख, शास्त्रीय माहितीचे अध्ययन करून स्पष्ट केले आहे, की मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या लहरींचा आरोग्यावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. 
 
या प्रकारच्या किरणोत्सर्गाबाबत इतर देशांमध्ये असलेल्या कायद्यांच्या तुलनेत दहा पट कठोर कायदे भारतात आहेत. परंतु, तरीही किरणोत्सर्गाबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सरकारतर्फे जागरुकता मोहीम राबविली जाईल. या मोहिमेचा भाग म्हणून अलीकडेच डेहराडूनमध्ये कार्यक्रम झाल्याचाही दावा मंत्री मनोज सिन्हा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *