गेल्या वर्षी मुंबईत संसर्गजन्य तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. सरकारी व पालिका रुग्णालयात ७,९९२ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर २०१६ या वर्षात अवघ्या सात महिन्यांत ७,०५० रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार घेत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
यावरून मुंबईकरांचा ताप उतरला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पण विश्रांती घेऊन परतलेला पाऊस मुंबईमध्ये साथींचे आजारही घेऊन आल्याने तापाची टांगती तलवार अद्यापही मुंबईकरांवर कायम असल्याचे म्हणावे लागेल.
२०१५ या वर्षी मुंबईत पावसाच्या लंपडावामुळे शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले होते. त्यातच शहरातील तापाच्या रुग्णांची संख्येतही वाढ पाहायला मिळाली होती. पण यंदाच्या वर्षी तापाच्या रुग्णसंख्येत किंचित घट नोंदवण्यात आली आहे. मात्र, एकीकडे ताप व अन्य आजारांचे रुग्ण कमी झाले असले तरी कावीळच्या रुग्णांमध्ये यंदा वाढ दिसत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात मलेरियाच्या ८२० रुग्णांची नोंद झाली होती.
तर यंदाच्या वर्षी जुलैमध्ये ५८३ रुग्ण सापडले आहेत. तर लेप्टोचे गेल्या वर्षी ७८ रुग्ण होते तर यावर्षी ७६ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी डेंग्यूचे ५७ रुग्ण होते तर आता ६३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय २०१५ ला गॅस्ट्रोचे १,७५२ रुग्ण सापडले होते. तर यंदा ही संख्या १,६७२ वर पोहोचली आहे.
या सर्व आजारांच्या रुग्णसंख्येत घट असली तरी ती समाधानकारक नाही. कारण, सरकारी व पालिका रुग्णालयांत २०१६ या वर्षी जुलैमध्ये लेप्टोचे संशयित ३४६ व डेंग्यूचे संशयित ४३९ रुग्ण दाखल झाले होते. यावरून ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी जानेवारीपासून स्वाईन फ्लू या आजाराने मुंबईकरांना हैराण केले होते. २०१५च्या जुलैमध्ये स्वाईन फ्लूचे १९५ रुग्ण आढळून आले होते. पण यंदाच्या वर्षी जुलैला फक्त एकाच रुग्णांची नोंद झाली आहे. यावरून रुग्णसंख्येत जरी घट झाली असली तरी पावसाचा प्रकोप पाहता साथींच्या आजाराची साथ पसरू शकते. यामुळे मुंबईकरांनी निर्धार न राहता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.