पहिल्या डावात 304 धावांची आघाडी घेणाऱ्या भारताने चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजची 4 बाद 48 अशी अवस्था करत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. सकाळच्या सत्रात झालेला खेळ वगळता दिवसभर पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे आज (बुधवार) अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी सहा बळी मिळविणे आवश्यक आहे.
त्यापूर्वी तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीज गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा जमैका कसोटीतही चालू राहिली. अजिंक्य रहाणेने शतक ठोकून भारताची आघाडी भक्कम केली. तीनशेच्या पुढे आघाडी गेल्यावर कोहलीने भारताचा डाव 9 बाद 500 धावसंख्येवर घोषित केला. वेस्ट इंडीजचा दुसरा डाव चालू होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने पुढे खेळ झाला नाही. सामन्याचे अजून पूर्ण दोन दिवस बाकी असले, तरी येथील समुद्रात वादळ घोंघावते आहे. त्याचा परिणाम सामन्यावर होण्याची चिन्हे आहेत. पण, खेळ सुरू झाल्यावर उपलब्ध वेळेत यजमान फलंदाजांना गुंडाळण्याची ताकद भारतीय गोलंदाजीत आहे आणि ती त्यांनी दाखवून द्यायला हवी.
हवामान खात्याने जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. प्रत्यक्षात सबीना पार्क मैदानावर लख्ख सूर्यप्रकाश होता. गोलंदाजीत काहीच दम नसल्याने रहाणे-साह या भारताच्या नाबाद जोडीला खेळ चालू झाल्यावर जम बसवायला जास्त मेहनत करावी लागली नाही. सबीना पार्कच्या मोठ्या मैदानावर दोघांनी मोकळ्या जागेत चेंडू ढकलून धावा पळून काढण्यावर भर दिला. रहाणेचे अर्धशतक लगेचच पूर्ण झाले.
जमैकात 1 ऑगस्टला “इमेन्सीपेशन‘ डे साजरा केला जातो. जुलमी ब्रिटिश राजवटीतील स्लेव्हरी प्रकार 1834 मध्ये बंद झाला. त्याच्या स्मृती जागृत ठेवायला हा दिन साजरा केला जातो. सुटी असल्याने थोडे जास्त प्रेक्षक सबीना पार्क मैदानावर आले होते. पण, बॅट – बॉलमध्ये खरी लढत चालू नसल्याने खेळात फार रंग चढत नव्हता. त्यातून रहाणेला जीवदान दिल्यामुळे प्रेक्षक आणखीनच वैतागले. दिवसाच्या पहिल्या सत्राच्या अखेरीस जेसन होल्डरने साह याला पायचित करून विंडीजला यश मिळवून दिले.
त्यानंतर दिवसाच्या दुसऱ्या सत्रात रहाणेने आपले शतक पूर्ण केले. राहुलपाठोपाठ रहाणेनेदेखील शतक ठोकल्यामुळे विंडीज गोलंदाजांच्या जखमेवर मीठच चोळले गेले. भारताची आघाडी पुढे फुगतच गेली. भारताची आघाडी भक्कम झाली. याची खात्री करून घेत कोहलीने भारताचा डाव सोडला. पहिल्या डावात 304 धावांनी पिछाडीवर पडलेल्या विंडीजच्या फलंदाजांनी पॅडअप केले खरे; पण पावसामुळे पुढे खेळ झालाच नाही. आता कितीही तुफान आले तरी विंडीजला ते वाचवू शकेल असे नाही. केवळ त्यांचा पराभव लांबला जाईल.