खोल दरी, दाट धुके, रिमझिम पाऊस आणि घोंघावणारा वारा अशा वातावरणात दऱ्या-खोऱ्यांच्या साक्षीने पावनखिंडीजवळील जखिणीच्या कड्यावर रोप वेवर जयदीप जाधव आणि रेश्मा पाटील विवाह बंधनात अडकले.
पारंपरिक विवाह सोहळ्याला फाटा देऊन निसर्गाच्या सान्निध्यात झालेला पश्चिम महाराष्ट्रातला हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईक, तरुणाई आणि मलकापूर, आंबा, विशाळगड आणि येळवण जुगाई परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जखिणीच्या कड्यावर अडीचशे फूट खोल दरीवर साडेतीनशे फूट लांब रोप वेची कार्यकर्त्यांनी व्यवस्था केली होती. दुपारी बारा वाजता हा सोहळा झाला. जोतिबावरील सागर ढोली यांनी पौराहित्य केले. वधू-वरांना रोप वेवर उभे करून मंगलाष्टका म्हणण्यात आल्या. उपस्थितांनी उभयतांवर पुष्पवृष्टी केली.
पश्चिम महाराष्ट्रात गाजावाजा झालेल्या या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे नियोजन हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील, वेस्टर्न माऊंटनचे विनोद कांबोज, मलय ऍडव्हेंचरचे मेहबूब मुजावर यांनी केले होते. गोवा, काश्मीर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागांतील कार्यकर्त्यांनी विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.