वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलनं शानदार फलंदाजीच्या जोरावर शतक झळकावत 158 धावांची खेळी केली. पहिल्या डावात यजमानांच्या 196 धावांचा पाठलाग करताना भारतानं उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत 125 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 358 धावा केल्या. त्यामुळे भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध 162 धावांची आघाडी घेतली.
राहुलच्या शतकी खेळीमुळे दुसऱ्या कसोटीत भारताची पकड मजबूत झाली आहे. राहुलनं 303 चेंडूंत 15 चौकार आणि 3 षटकारांसह 158 धावा केल्या. तर पुजारा 46 धावांवर बाद झाला आहे. या सामन्यात राहुल आणि पुजारानं सर्वाधिक 121 धावांची भागीदारी केली आहे. मुरली विजय दुखापतग्रस्त असल्यानं संघात स्थान मिळालेल्या राहुलने संधीचा अचूक लाभ घेत चांगली कामगिरी करत 58 चेंडूंत अर्धशतक झळकावले.
दुसरा सलामीवीर शिखर धवन आज मोठी खेळी करू शकला नाही. परंतु त्याने 27 धावा करताना राहुलला चांगली साथ दिली. डॅरेन ब्राव्होने रसेल चेसच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. वेस्ट इंडिजच्या गॅब्रियलनं लोकेश राहुलला तंबूत परत पाठवलं. भारताचा कर्णधार कोहलीनं 90 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार लगावत 44 धावा केल्या आहेत. तर रहाणे आणि साहा मैदानावर टिकून होते. अश्विन 3, साहा* 17, रहाणे* 42 धावा केल्या आहेत.