सिमॅटेकच्या नॉर्टनने स्मार्टफोन्स व मोबाईल अॅप्सद्वारे सुरक्षेतील त्रुटी व गोपनीयता भंग होण्याचे धोके यावर मोबाईल सर्वेक्षणातून प्रकाश टाकण्यात आला असून भारतातील निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार मोफत अॅप ग्राहक घेतात; परंतु त्यात आपली खासगी माहिती उपलब्ध करून देतात, असे स्पष्ट झाले आहे.
ग्राहक साधारणत: दिवसातून ४१ वेळा स्मार्टफोन पाहतात आणि मोबाईल सुरक्षा नष्ट होण्याचा धोका वाढला आहे, असे समोर आले आहे.
सिमॅटेकच्या नॉर्टन मोबाईल इनसाईट्सतर्फे १ कोटी ८० लाख मोबाईल अॅप्सची पडताळणी करण्यात आली. तेव्हा ३० लाख ३० हजार अॅप्स हे मालवेअर असल्याचे स्पष्ट झाले. मात्र मोबाईल ग्राहकांसाठी सर्वात मोठे धोके व्हायरस, मालवेअर हल्ले (३४ टक्के), क्रेडिट कार्ड व बँक खात्याच्या तपशीलाचा गैरवापर (२१ टक्के), वैयक्तिक माहिती चोरणे (१९ टक्के ) हे आहेत.
यासंदर्भात सिमॅटेक नॉर्टन कंपनीचे भारतातील व्यवस्थापक रितेश चोप्रा यांनी सांगितले की, अगदी अजाणतेपणी ग्राहक वैयक्तिक माहिती मोबाईलमध्ये ठेवतात.
ही माहिती म्हणजे खासगी बाबतीत केलेली मोठी तडजोड व धोका आहे. मोबाईल गोपनीयतेबाबत ग्राहक स्वत:च स्वत:चा शत्रू आहे, असे या निष्कर्षातून समोर आले आहे.
५० टक्के भारतीयांच्या मोबाईल्समध्ये २०पेक्षा जास्त अॅप्स असतात. केवळ छान दिसते म्हणून अॅप डाऊनलोड केले असे सांगणारे ग्राहक पाचपैकी एक भारतीय असतो.