साडेसहा लाख रुपयांना विकून बळजबरीने लग्न लावले
पैशासाठी सावत्र आईने आपल्या १४ वर्षांच्या मुलीला विकल्याची घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे. त्या मुलीचे त्या व्यापाऱ्याशी बळजबरीने लग्नही लावून देण्यात आले होते. या मुलीने सुटका करून पोलीस ठाणे गाठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून तिच्या सावत्र आईचा शोध सुरू आहे.
पीडित मुलगी ही मूळची राजस्थानच्या राणी तालुक्यातील पाली गावात राहत होती. तिने तुळिंज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या वर्षी तिची सावत्र आई शांतीदेवी हिने तिला साडेसहा लाख रुपयांना नालासोपाऱ्यातील लखाराम चौधरी (३२) या व्यापाऱ्याला विकले होते. आरोपी चौधरी आशाला घेऊन नालासोपाऱ्यातील संतोष भुवनमधील वालईपाडा येथे आला. तेथे त्याने आशाचे वय २० दाखवून तिच्याशी ९ ऑगस्ट २०१५ रोजी लग्नही केले. त्यासाठी वयाचे खोटे प्रतिज्ञापत्र, नोटरी तयार करण्यात आली होती. लखाराम सतत आशाला मारहाण करून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत होता. तिला तो घरात कोंडूनही ठेवायचा. लखाराम आशाला पुण्यात १५ लाख रुपयांना विकणार असल्याची कुणकुण आशाला लागली. त्यामुळे तिने कशीबशी आपली सुटका करवून तुळिंज पोलीस ठाणे गाठले आणि आपली कैफियत मांडली. वैद्यकीय चाचणीत आशाचे वय १४ असल्याचे निष्पन्न झाले. तुळिंज पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून लखाराम चौधरी याला अटक केली असून त्याच्यावर बलात्कार, पोक्सो, फसवणूक आदी गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणातील आशाची सावत्र आई शांतीदेवी हिच्या अटकेसाठी एक पथक राजस्थानला रवाना करण्यात आले आहे. आशाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या आईने यापूर्वीही तिला दोन वेळा विविध व्यक्तींना विकले होते. अशा प्रकारे त्या गावात मुलींना विकण्याचा धंदा जोरात असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.
पीडित मुलीला तिच्या आईने साडेसहा लाख रुपयांना विकले होते. आरोपी लखारामने तिच्याशी बेकायदेशीर लग्न केले होते. तिचा तो शारीरिक छळ करत होता. या प्रकरणातल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.