अभिनेत्रीच्या घरी ५० लाखांची चोरी; साखरपुड्याची अंगठीही गेली चोरीला

टीव्ही अभिनेत्री ऋचा दीक्षित हिच्या घरी ५० लाखांची चोरी झाल्याचे वृत्त आहे. चोरांनी रोख रक्कमेसह दागिने पळवल्याचे कळते. ही चोरी ऋचाच्या कानपूर येथील घरी झाली. तिथे तिचे आई-वडिल राहतात. ज्यावेळी चोरीची घटना घडली तेव्हा तिचे आई-वडिल त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी कोटा येथे गेले होते. सावधान इंडिया, क्राइम पेट्रोल या मालिकांमध्ये ऋचाने काम केले आहे. ऋचाचे लवकरचं लग्न होणार होते. त्याच कारणास्तव तिच्या घरात मोठी रक्कम आणि दागिने ठेवण्यात आले होते. ११ जुलैला साखरपुडा झालेल्या ऋचाचे लग्न काही दिवसांतच होणार होते. बंगळुरु स्थित एका इंजिनियरशी तिचा साखरपुडा झाला आहे. यात आपली साखरपुड्याची अंगठीही चोरी गेल्याचे ऋचाने सांगितले.
ऋचा म्हणाली की, या चोरीमुळे आमचे बरेचं नुकसान झाले आहे. आमच्या घरी चोरी होण्याची ही तिसरी वेळ आहे. ११ जुलैला माझा साखरपुडा झाला होता. त्यानंतर माझे आई-वडिल कोटा येथे गेले होते. आमच्या शेजा-यांनी १८ जुलैला आम्हाला फोन करून आमच्या घराचा मुख्य दरवाजा तुटलेला असल्याचे सांगितले. त्यांना चोरी झाल्याची शंका आली होती. आम्हाला हे कळताचं आम्ही सगळेजण लगेच घरी परतलो. घरी गेल्यावर पाहिले तर सर्व सामान विखुरलेले होते. दरवाजा आणि लॉक तुटलेला होता. सर्व पैसे आणि दागिनेदेखील गायब होते, असे ऋचा म्हणाली.
या चोरीसंदर्भात ऋचाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, आपल्या एका शेजा-यावर चोरीचा संशय असल्याचे तिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *