पाऊस पुन्हा सक्रिय

गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागांत पावसाचा जोर राहिला. पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरल्याने त्याचा वीजनिर्मितीचा पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. धरणातून 1200 क्युसक पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगेची पातळी दुपारपर्यंत वाढली. यानंतर पंचगंगेची पातळी पुन्हा कमी होऊ लागली आहे.

जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात धुवाँधार हजेरी लावणार्‍या पावसाने गेल्या पाच-सहा दिवसांपासून उघडीप दिली होती. शुक्रवारी सकाळपासून मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू होता. शहर आणि परिसरात जोर नसला तरी पावसाची संततधार सुरू होती. काही काळ काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.

पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरीसह कासारी, कडवी व कुंभी या चार धरणांतून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. जांबरे, घटप्रभा आणि कोदे ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने यापूर्वीच भरल्याने त्यांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे. धरण भरण्यास आता 0.92 टी.एम.सी. पाणी कमी आहे. पावसाचा जोर राहिला तर येत्या चार-पाच दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

पंचगंगेच्या पातळीत घट

पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगेची पातळी कमी होत चालली होती. गुरुवारी रात्री पंचगंगेची पातळी 17.1 फुटांपर्यंत खाली गेली होती. पाऊस पुन्हा सुरू झाल्याने तसेच धरणातून सुरू असलेल्या विसर्गाने नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरू झाली आहे. पंचगंगा नदीपात्रात सुमारे दोन हजार क्युसेक पाण्याचा धरणातून विसर्ग होत आहे. यामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. पंचगंगेची पातळी आज सकाळी 18.1 फुटांपर्यंत वाढली होती. सकाळी दहा वाजेपर्यंत पातळी स्थिर होती. यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत पातळी 18 फुटांपर्यंत होती. यानंतर पातळी कमी होत गेली. सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पातळी 17.6 फुटांपर्यंत कमी झाली होती.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण सरासरी 5.92 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस शाहूवाडीत 13 मि.मी. इतका नोंदवला गेला. आजरा आणि चंदगड तालुक्यांत 11 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात 8 मि.मी. पावसाची नोंद झाली.

राधानगरीचा विसर्ग वाढवला

राधानगरी भरत आल्याने वीजनिर्मितीसाठी त्यातून सुरू असलेला विसर्ग दुपटीने वाढवण्यात आला आहे. धरणातून 600 क्युसेक विसर्ग सुरू होता. तो वाढवून आता 1200 क्युसेक इतका करण्यात आला आहे. कासारी धरणातून 250 क्युसेक, तर कुंभी धरणातून 300 क्युसेक विसर्ग वीजनिर्मितीसाठी केला जात आहे. कडवी धरणातूनही वीजनिर्मितीसाठी 202 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. घटप्रभा धरणातून 300 क्युसेक विसर्ग सांडव्यावरून सुरू आहे. जांबरे प्रकल्पातून 150 क्युसेक विसर्ग होत आहे. कोदे धरणातून 404 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *