जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल व निदर्शकांमध्ये झालेल्या चकमकीत शुक्रवारी एक तरुण ठार झाला. यामुळे काश्मीर खो-यात हिंसाचारामुळे ठार झालेल्यांची संख्या ४५ वर गेली आहे.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मुश्ताक अहमद भट हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एसएमएसएस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
हिजबुलचा दहशतवादी बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर राज्यात उसळलेल्या हिंसाचाराचा सामना राज्यातील पीडीपी-भाजपा सरकार करत आहे. ८ जुलै रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर प्रथमच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे काश्मीरला भेट देणार आहेत.
नमाजासाठी शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात नागरिक जमले होते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून १० जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती.