आश्‍वासनानंतर भाजी विक्रेत्यांचा बंद मागे

रविवारपासून सुरू असलेला भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद अखेर बुधवारी रात्री मागे घेण्यात आला. याबाबत बुधवारी मंत्रालयात सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती अखिल भाजी मंडई चिंचवडचे अध्यक्ष अतुल पडवळ यांनी दिली. मात्र पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने मागण्या मान्य केल्यास भाजी मंड्या सुरळीत सुरू राहतील; अन्यथा पुन्हा एकदा बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशारा अतुल पडवळ यांनी दिला आहे.

गेले काही दिवस सरकारने आडतबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध म्हणून पुणे जिल्ह्यातील; तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. त्यावर बुधवारी मंत्रालयात जिल्हा किरकोळ व्यापारी संघर्ष कृती समितीच्या वतीने  सहकारमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी व्यापारी संघटनांशी चर्चा करण्यात आली.  चर्चेअंती पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर व्यापार्‍यांच्या अडचणी समजून घेऊन यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले. आश्‍वासनानंतर रविवारपासून सुरू असलेला बेमुदत बंद अखेर मागे घेण्यात आला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, योगेश टिळेकर, अतुल पडवळ, सुनील कुदळे, दत्ता थिटे आदी उपस्थित होते.

भाजी व्यापार्‍यांच्या बंदमुळे गेले काही दिवस भाजी न मिळाल्याने ग्राहकांसहित हॉटेल व्यावसायिक; तसेच शेतकरी व इतर घटकांचे हाल झाले होते. बुधवारी शहरातील काही ठिकाणी आठवडे बाजार भरत असल्याने तेथील नागरीकांना काही अंशी दिलासा मिळाला; मात्र रोज भाजी विक्री करणार्‍या विक्रेत्यांचीही बंदमुळे कमाई न झाल्याने उपासमार झाली होती. सरकारच्या आडत निर्णयाच्या विरोधात हा बंद असला, तरी सुरुवातीपासूनच काही विक्रेत्यांचा या बंदला विरोध होता. त्यामुळे दोन दिवसांच्या बंदनंतर मात्र या व्यापार्‍यांमध्ये बंदबाबत फूट पाहायला मिळाली. सरकारने ठरवलेल्या 6 टक्के आडतीऐवजी 10 टक्के आडत व्यापार्‍यांकडून आकारण्यात येत असल्याने, हा बंद पुकारण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती; मात्र मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर बंद मागे घेण्यात आल्याची माहिती चिंचवड भाजी मंडईचे समीर गरुड यांनी दिली. व्यापारी संघटनांनी दिलेल्या निवेदनात, राज्य शासनाने लावलेली 8 टक्के आडत  ही  न परवडणारी असल्यामुळे ती रद्द करून 3.40 इतकी आडत आकारावी; तसेच एका गाळ्यावर एक व्यापारी अशी  परवानगी असताना त्या ठिकाणी डमी व्यापारी बसवून व्यवसाय केला जातो त्यावर बंदी आणावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या होत्या. रविवारपासून बंद असलेल्या भाजी मंडईमुळे नागरिकांचे भाजीपाल्यासाठी हाल होत होते. बंद मागे घेण्यात आल्यामुळे भाजी मंड्यांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *