लुप्त झालेली वैदिक काळातील नदी सरस्वतीला पुन्हा प्रवाहित करण्यासाठी हरियाणा सरकारने अनेक वर्षांपासून अथक मेहनत घेतलेली आहे. या नदीचा प्रवाह उत्खनन करून शोधून काढण्यात आला होता. आता या महिन्याच्या अखेरीस नदीच्या प्रवाहाच्या मार्गात पाणी सोडले जाणार आहे.
सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्डने याबाबतचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यानुसार उंचावर असलेल्या चंदना गावातून 30 जुलैला नदीच्या मार्गावर पाणी सोडले जाईल. या मार्गात यमुनानगर, कुरुक्षेत्र आणि कैथल जिल्हे येतात. मान्सूनच्या पावसामुळे या प्रवाहातील पाणी टिकून राहील, असे बोर्डच्या तज्ज्ञांना वाटते. दीर्घकाळ हा प्रवाह राहावा, यासाठी आदी बद्री गावात बंधारा बांधण्याचीही योजना आहे. सरस्वतीचा उगम हिमालयातील याच ठिकाणी झाला असे मानले जाते. या ठिकाणी धार्मिक स्थळाबरोबरच वॉटर पार्क, बॉटनिकल गार्डन आणि प्राणीसंग्रहालय बनवून पर्यटन स्थळही करण्याची योजना आहे. यमुनानगरमध्ये सरस्वती नदीच्या प्राचीन प्रवाह मार्गात उत्खनन केल्यानंतर तिथे पाणी आढळले होते. एके काळी ही नदी हरियाणा, राजस्थान, गुजरातमधून वाहत अरबी समुद्राला मिळत होती.