सैराट चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली असली तरी या चित्रपटाने राज्याचे समाजमन बिघडविले. सूड आणि व्देषाची भावना वाढविली. अशा चित्रपटांमुळेही कोपर्डीसारख्या घटनांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य भास्कर जाधव आणि भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी केला. चौधरी यांनी तर या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली.
कोपर्डी बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेत सैराट चित्रपटावरही काही सदस्यांनी सडकून टीका केली. हा चित्रपटही समाजात भेदभाव आणि सूडभावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला. भास्कर जाधव म्हणाले, सैराट हा मराठी चित्रपट गाजला असला आणि त्याने शंभर कोटींची कमाई केली असली तरी या चित्रपटाने राज्याचे समाजमन बिघडविण्याचेही काम केले. या चित्रपटाची थीम ही समाजात भेदभाव आणि सुडाची भावना तयार करणारी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मिडीयावरील मेसेज पाहीले तर त्याची कल्पना येईल.
चित्रपट हे समाजात प्रबोधन करणारे असतात. मात्र, गावाचा पाटील आणि पुढारी म्हटला की तो दबंगच असणार, तो गावाला आणि लोकांना त्रास देणाराच असेल अशीच प्रतिमा रंगविली जात आहे. सैराट चित्रपट रोमिओ आणि ज्युलियटच्या प्रेमकथेसारखा आहे. यापूर्वीही एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक यासारखे चित्रपट अशाच विषयावर निघाले. मात्र, त्यातून कधी समाजात भेदभाव तयार झाला नाही. मात्र, सैराटमुळे समाजमन बिघडले, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
सैराट सारख्या चित्रपटामुळे सभाजात व्देषाची भावना निर्माण केली. या चित्रपटावर बंदी घातली पाहीजे अशी मागणी मनिषा चौधरी यांनी करताना दुबई आणि सौदी अरेबियाप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काराच्या गुन्ह्यासाठी हातपाय तोडण्यासारखी शिक्षा झाली पाहीजे. आरोपींना भर चौकात अशा शिक्षा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.