मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तुळशी तलाव आज सकाळी ६ वाजता भरुन वाहू लागले. गेल्यावर्षीपेक्षा दोन महिन्यांआधीच हा तलाव यंदा भरला आहे. मात्र आणखी काही तलावं भरुन वाहेपर्यंत पाणीकपात कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काहीकाळ पाणीकपातीची झळ सहन करावी लागणार आहे. गेल्यावर्षी मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली़ यावर्षी पाऊस जोरदार असल्याने तलावांमधील जलपातळी झपाट्याने वाढत असल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरीत आहे. त्यात आज सकाळी तुळशी तलाव भरुन वाहू लागला. गेल्यावर्षी हा तलाव २२ सप्टेंबर रोजी भरला होता. तसेच तलावांमध्ये सात लाख ५२ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे. परंतु तुळशी तलावातून मुंबईची केवळ एक टक्काच तहान भागेल़ उर्वरित ९९ टक्के पाण्याची तजवीज करणारी तलावं भरेपर्यंत पाणीकपात मागे घेण्याचा प्रस्ताव नसल्याचे, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
– मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़.
– गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे.
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे.
जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये
तलाव – कमाल… किमान… आजची स्थिती… आजचा पाऊस(मि़मी़)
मोडक सागर १६३़१५ १४३़२६ १५६़१५ ६५़००
तानसा १२८़६३ ११८़८७ १२५़५२ ३९़२०
विहार ८०़१२ ७३़९२ ७७़५२ ११२़२०
तुळशी १३९़१७ १३१़०७ १३९़३० ९०़००
अप्पर वैतरणा ६०३़५१ ५९५़४४ ५९८़७६ २७़००
भातसा १४२़०७ १०४़९० १२८़२६ ४८़००
मध्य वैतरणा २८५़०० २२०़०० २६८़१० २१़६०
एकूण २०१६ -७५२४४५ दशलक्ष लीटर २०१५- २६९१३७ दशलक्ष लीटर