उद्या लाखाचा मोर्चा काढण्याची तयारी; काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेचाही पाठिंबा –

दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस पाडल्यावरून निर्माण झालेल्या वादात सत्ताधारी भाजपविरुद्ध भारिप-बहुजन महासंघ, डावे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अशी राजकीय आघाडी उघडण्यात आली आहे. हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून भाजपला लक्ष्य करण्याची सत्ताधारी शिवसेनेचीही खेळी राहणार आहे. आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेली ही वास्तू पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरवादी तसेच डाव्या-पुरोगामी संघटनांच्या वतीने १९ जुलैला मुंबईत विधान भवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सर्व जिल्हय़ांत जोरदार तयारी सुरू आहे. राज्यभरातून सुमारे एक लाखाच्या आसपास आंबेडकरी अनुयायी या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज आहे. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी दिली. पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने ही वास्तू पाडली असली, तरी त्यांना भाजप सरकार पाठीशी घालत आहे, असा प्रकाश आंबेडकर व अन्य नेत्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा मोर्चा केवळ ट्रस्टच्या बेकायदा कृतीच्या विरोधात असणार नाही, तर शक्तिप्रदर्शन करून सत्ताधारी भाजपलाही लक्ष्य करण्याचे डावपेच आहेत. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचाही आतून पाठिंबा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *