सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात गुरूवारी पावसाचा जोर ओसरला. गेल्या काही दिवसापासून धुवाँधार हजेरी लावणार्या पावसाने गुरुवारी उसंत घेतली. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांशी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सुमारे दोन आठवडे कोसळणार्या पावसाने गेल्या चार-पाच दिवसांत धुवाँधार वृष्टी केली. बुधवारी उघडझाप करणार्या या पावसाने गुरूवारी मात्र विसावा घेतला. दिवसभरात एक-दोन हलक्या सरी कोसळल्या. मात्र, जोर कमी झाल्याचे चित्र राहिले. सकाळी व दुपारी लख्ख सूर्यप्रकाशाचेही दर्शन झाले. पावसाच्या रिपरिपीमुळे घर न सोडलेले सातारकर यानिमित्त घराबाहेर पडल्याचे दिसत होते.
धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये खालीलप्रमाणे पाणीसाठा झाला होता. कोयना 46.62 टीएमसी, धोम 5.54 टीएमसी, कण्हेर 5.20 टीएमसी, भाटघर 11.58 टीएमसी, वीर 6.28 टीएमसी, उरमोडी 6.15 टीएमसी, धोम बलकवडी 2.68 टीएमसी, महू 0.222 टीएमसी, हातगेघर 0.886 टीएमसी, नागेवाडी 0.107 टीएमसी, मोरणा गुरेघर 0.969 टीएमसी, उत्तरमांड 0.54 टीएमसी, तारळी 3.410 टीएमसी, निरा-देवघर 5.78 टीएमसी आणि वांग 0.622 टीएमसी असा पाणीसाठा झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियत्रंण कक्षातून देण्यात आली. गुरुवार सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 9.5 मि.मी, जावली 23.1 मि.मी, कोरेगाव 2.1 मि.मी, कराड 7.1 मि.मी, पाटण 24.0 मि.मी, फलटण 0.0 मि.मी, माण 0.0 मि.मी, खटाव 0.9 मि.मी, वाई 2.7 मि.मी,महाबळेश्वर 70.6 मि.मी, खंडाळा 0.0 मि.मी. असा मिळून एकूण 140.0 मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली.