गेला आठवडा भर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील प्रमुख नद्या उग्रतेची पातळी गाठण्याच्या तयारीत होत्या. मात्र गेले दोन दिवस पाऊस कमी झाल्याने या नद्यांच्या जलपातळीत संथ प्रवाहीपणा आला. मंगळवारी राजापूरची अर्जुना, खेडची जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी आणि बावनदी या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. मात्र दोन दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीत या नद्यांच्या परिघातील संभाव्य पूरस्थिती टळली आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही अनुकुल वातावरण असून अनेक धरणात सकारात्मक पाणीसाठी गेल्या पंधरावड्यात झालेल्या पाऊसमानामुळे झाला आहे. जिल्ह्यातील पन्नासटक्के धरणसाठा झाला असून जिल्ह्यातील 24 धरणांना अद्यापही उत्तम पर्जन्यमानाची अपेक्षा आहे.
सुमारे 50 लाखाची हानी जिल्ह्यात पावसामुळे घरांची पडझड, गोठ्यांची हानी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीत वाढ झाली आहे. जूनमध्ये झालेल्या मान्सूनच्या सक्रियतेने जिल्ह्यात सुमारे 32 लाखाची हानी झाली होती. जुलैच्या पंधरावड्यात ही हानी पन्नास लाखाच्या घरात पोचण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पावसामुळे 232 घरांची अंशतः पडझड झाली असून यामध्ये या मालमत्तेचे 26 लाख 4 0 हजार 967 रुपयांचे नुकसान झाले. शेती उपयोगी जनावरांच्या 223 गोठ्यांचीही मुसळधार पावसामुळे पडझड झाली असून या मालमत्तेची सुमारे 14 लाख 70 हजाराची हानी झाली. सार्वजनिक मालमत्तांचे पावसामुळे साडेआठ लाखाचे नुकसान झाले. आतापर्यंत पावसाने जिल्ह्यात 49 लाख 60 हजार 967 रुपयांची वित्तहानी झाली आहे.
पावासाळ्यात होणार्या नुकसानीची मालिका बुधवारपर्यंत सुरू होती. रत्नागिरी जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यात पांगरी येथे 2 गोठ्यांचे अंशत: 19 हजार 500 रुपयांचे नुकसान व एका घराचे अंशत: 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. पावसामुळे सुनिल सदाशिव साहील यांच्या आंबा-काजू झाडांचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोंड्ये तर्फे कोंडूस येथे एक घर खचल्याने नुकसान झाले आहे.