आधार कार्ड होणार अधिक ‘स्मार्ट’

‘सामान्यांचा अधिकार’ ब्रीदवाक्य असलेले आधार कार्ड अधिक चकाचक होणार आहे. आधार काढतांना आता मूळ कागदपत्रे स्कॅनिंग केले जाणार आहे. त्यामुळेच नागरिकांची ओळख अधिक स्पष्ट आणि चांगली होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 96 टक्के नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली.
आधार कार्ड काढणे म्हणजे नागरिकांसाठी दिव्यच म्हणावे लागले. अनेकदा अर्ज आणि कागदपत्रे देऊनही नागरिकांना वेळेत आधार मिळत नसायचे. तर काहीजणांना मिळालेल्या आधारवरील छायाचित्र अस्पष्ट असल्याने अनेक ठिकाणी पुरावा म्हणून देतांना नागरिकांची कोंडी होत असे. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन सरकारने आता ते अधिक चांगले करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आधार काढताना त्यासोबत नागरिकांना मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागणार आहे.
केंद्रावर या मूळ कागदपत्रांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. परिणामी आधार तयार करतांना ते सुस्पष्ट आणि त्याची सुरक्षितताही वाढणार आहे. त्यामुळेच आधार कार्डमध्ये अधिक पारदर्शकता येण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात 1 जुलैपासून प्राथमिक स्तरावर या पद्धतीने आधार कार्ड नोंदणीला प्रारंभ झाला असून टप्याटप्याने तो सर्वत्र लागू केला जाईल.प्रशासनाने 15 तालुक्यांमध्ये 58 आधार मशिन्स्च्या माध्यमातून नोंदणी सुरू आहेत. ही सर्व मशिन्स् आंगणवाड्यांमध्ये ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे काही खासगी संस्थांच्या माध्यमातूनही आधार नोंदणी केली जात आहे.  जिल्ह्यात आत्तापर्यंत 58 लाख 78 हजार 203 नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी 96 टक्के इतकी आहे. दरम्यान, नाशिक तालुक्यात सर्वाधिक 18 लाख 43 हजार 39 नागरिकांचे आधार कार्डे काढण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *