भाज्यांचे दर घसरू लागले!

बाजार समितीतील घाऊक व्यापार्‍याचा   संप बुधवारी मिटला असला तरी गुरुवारी पहाटे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती घाऊक व्यापारी आणि 2 हजार खरेदीदारांमध्ये अडतवरुन वाद झाला.  खरेदीदारांकडून 8 टक्के अडत घेणार नाही, असे व्यापार्‍यांनी सांगितल्यानंतर खरेदीदारांनी माल खरेदीला सुरुवात केली. मुंबई एपीएमसीत गुरुवारी पहाटे 625 गाड्यांची आवक झाली तर पनवेल, कल्याण, ठाणे आणि मुंबईत 1हजार 75 गाड्यांची आवक झाली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून आकाशाला भिडणारे भाज्यांचे दर आज 25 ते 40 टक्क्यांनी घसरले.
मुंबई एपीएमसीत नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातून आणि परराज्यातून 625 गाड्या आल्या होत्या. यामध्ये कोबी, टोमॅटो, फ्लॉवर यांची आवक मोठ्या प्रमाणात होती. तर संप काळात नाशिक, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी वळवण्यात आलेल्या भाजीपाल्यांच्या गाड्या तब्बल 1 हजार 75 गाड्या गुरुवारी कल्याण, ठाणे, मुंबईमध्ये आणि पनवेलमध्ये दाखल झाल्या. गुरुवारी पहाटे 3 वाजता गाड्यांची आवक पाहून व्यापारी थक्क झाले. यावेळी मुंबई एपीएमसीत येणार्‍या खरेदीदारांनी म्हणजेच किरकोळ व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालावर 8 टक्के आडत देण्यास नकार दिला. व्यापारी आणि खरेदीदारांमध्ये अडत वसुलीवरुन वादही झाले. बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यापार्‍यांनी खरेदीदारांकडून अडत वसुल करावी आणि शेतकर्याला माफ करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार घाऊक व्यापार्‍यांनी खरेदीदारांकडून गुरुवारपासून अडत वसुलीचा निर्णय घेतला होता. मात्र व्यापार्यांना गुरुवारी अडतीशिवायच आपला व्यापार करावा लागला. याबाबत शनिवारी दुपारी 12वाजता किरकोळ व्यापारी आणि घाऊक व्यापार्यांची एक बैठक एपीएमसीत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *