मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपून काढले असून, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराला पुराचा तडाखा बसला. मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक सुमारे अडीच तास विस्कळित झाली. शनिवारी सकाळपर्यंत रायगड जिल्ह्य़ात सरासरी ११७.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्य़ातील बहुतांश भागात पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्य़ात सुरू असलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शनिवारी सकाळापासूनच जिल्ह्य़ातील सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, गाढी, आंबा, उल्हास आणि आंबा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सकाळी अकराच्या सुमारास सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे महाड शहरातील सखल भाग जलमय झाला. मासळी बाजार, गाडी तळ, दस्तुरी नाका, बाजारपेठ परिसराला पुराचा तडाखा बसला. दस्तुरी नाका ते नाते िखड परिसर पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात चिरेिखड येथे तर मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंड येथे दरडी कोसळल्या. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्यानंतर काही काळानंतर महाड बाजूकडे जाणारी वाहने वाकण
– आमडोशी – रोहेमाग्रे कोलाड, तर मुंबईकडे जाणारी वाहने कोलाडहून रोहेमाग्रे नागोठणेकडे वळविण्यात आली होती. मात्र यात काही मिनिटांचा कालावधी गेल्यामुळे सुकेळी खिंडीच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व त्यात अवजड वाहने तसेच एसटी बसेससह कार, जीपसारखी अनेक वाहने अडकून पडली होती. महामार्गाचे ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या यंत्रसामग्रीद्वारे महामार्गावर पडलेली दगडी तसेच माती बाजूला करण्यात सव्वादोन तासांचा अवधी लागल्याने सकाळी साडेदहा वाजता महामार्गावरील वाहतूक सुरु झाली. धरणांतील पाणीपातळीत वाढ धरणक्षेत्रातदेखील चांगला पाऊस पडत असल्यामुळे सर्व धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. संदेरी, पाभरे, सुतारवाडी, वावे, फणसाड, उन्हेरे, कोथूर्डे, खैरे ही लघुपाटबंधारे विभागाची धरणे भरून वाहू लागली आहेत. दरम्यान, येत्या ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
