भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्याचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे तथा रा. चिं. ढेरे (८७) यांचे शुक्रवारी सकाळी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर यांचे ते वडील होत.
दरम्यान, ढेरे यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत शोक व्यक्त केला.
ढेरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. अखेर शुक्रवारी सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. दैवतशास्त्र, भारतीय इतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. या विषयांवर विपुल लेखन करत त्यांनी साहित्यात मोलाची भर घातली. ढेरे यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्रकाशित साहित्य
आज्ञापत्र, करवीरनिवासी श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी, त्रिविधा, दत्त संप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा, मामदेव, जनी आणि नागरी, मुक्तिगाथा महामानवाची, मुसलमान मराठी संतकवी, श्री नाथलीलामृत धार, केशव भिकाजी ढवळे, श्री पर्वतीच्या छायेत, लज्जागौरी (ग्रंथ), लोकसंस्कृतीचे उपासक, लोकसंस्कृतीचे विश्व, श्री विठ्ठल : एक महासमन्वय धार्मिक, श्री व्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर; संत, लोक आणि अभिजन धार्मिक; श्री स्वामी समर्थ धार्मिक बखर.
पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार १९८७
श्री विठ्ठल : एक महासमन्वय या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गं. ना. जोगळेकर पुरस्कार (२०१३)
त्रिदल फाऊंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (१४ मार्च २०१०), पुणे महापालिकेचा ‘महर्षी वाल्मीकी पुरस्कार (२०१३)’
अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२९-३-२०१५)
चिमण्या गणपती मंडळातर्फे ‘साहित्य सेवा सन्मान’