येथील ऐतिहासिक पुलाला भगदाड पडले असून पुरातत्त्व विभाग तसेच बांधकाम खात्याने तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
येथील एसटी बसस्थानकाजवळ अंबा नदीवर चारशे वर्षापूर्वी बांधलेला पूल आहे. पंधरा ते वीस वर्षापूर्वी या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. सध्या या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक होत असते.
पुलाच्या परिसरात मासेमारी करताना त्याच्या खालील बाजूच्या एका ठिकाणाचा भाग ढासळला असल्याचे एका मच्छीमाराला आढळले. बांधकाम खात्याने तातडीने लक्ष घालून त्याची डागडुजी करावी व हा ऐतिहासिक पूल जतन करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्यात या नदीला वारंवार पूर येतो. त्याच्या जोरदार प्रवाहाचा परिणाम पुलावर होतो. त्यामुळे वेळीच पुलाची डागडुजी करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.