जळगाव जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले असून चोपडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोपडा तालुक्यातील चहार्डी गाव पुराने वेढले गेले. चंपावती, रत्नावती या नद्यांच्या पुरात काही गुरे, बैलगाडय़ा, रिक्षा वाहून गेल्या. चोपडा-शिरपूर रस्त्यावरील काझीपुराजवळील पुलाचा भराव वाहून गेल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. धरणगाव तालुक्यात सर्वाधिक ९४ मिमी पावसाची नोंद झाली. जळगावमध्ये दाणा बाजारात पावसामुळे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास एका जुन्या इमारतीचे छप्पर कोसळले. दुकानात ग्राहक नसल्याने अनर्थ टळला. शहरात नाले सफाई न झाल्याने नाल्यांमधील पाणी घरात शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील बहुतेक भागात वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. चोपडा तालुक्यातील चहार्डी परिसरात ढगफुटीप्रमाणे स्थिती निर्माण झाली. चंपावती व रत्नावती या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे गावातील बाजारपेठेतील टपऱ्या, गुरे, बलगाडय़ा व काही रिक्षादेखील वाहून गेल्या. अमळनेर तालुक्यात चिखली नदीला पूर आला. जिल्ह्य़ात इतरत्र जळगाव ७२.७ मिमी, एरंडोल ४८, पारोळा ४२, पाचोरा ३२ मिमी याप्रमाणे पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदगावमध्ये दमदार पाऊस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या तालुक्यातील बळीराजाला बुधवारी पावसाने सुखद धक्का दिला. दुपारी दीड तासाहून अधिक वेळ दमदार पाऊस झाला. या पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. परंतु, पाहिजे तसा पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस पडल्यावर पेरणी करण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून ठेवले आहेत. बुधवारच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी हुरूप आला आहे. दुपारी पावसाचे आगमन होताच नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *